मुद्रांक शुल्क वाढीविरोधात शिवसेना मंत्री रामदास कदम आक्रमक
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2017 05:23 PM (IST)

मुंबई : शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी 5 टक्के तर ग्रामीण भागासाठी 4 टक्क्यांनी मुद्रांक शुल्क वाढवण्यात आलं. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्रांक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. बक्षीसपत्रासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही शिवसेनेनं विरोध केला आहे. त्यामुळे वाढवलेले मुद्रांक शुल्क शिवसेनेच्या दबावानंतर सरकार मागे घेणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.