शनिवारी रात्री दोघांनी स्नेहा यांचा भाचा अक्षय दीपक निवळेचं अपहरण केलं. सावंतवाडीचा रहिवासी असलेला अक्षय शुक्रवारी आपल्या मावशीच्या प्रचारासाठी वेताळबांबर्डेत आला होता. स्नेहा दळवी निवजेत प्रचाराला गेले असताना अपहरणाची घटना घडली.
दोघा अज्ञात व्यक्तींनी स्नेहा दळवी यांच्या घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. अक्षयने पाणी आणून दिल्यावर तेच पाणी त्याच्या तोंडावर मारलं आणि मिर्ची पूड मारुन त्याचं अपहरण केलं. अक्षयला घराशेजारच्या जंगलात झाडाला बांधून ठेवण्यात आलं.
स्नेहा दळवींना अक्षयच्या फोनवरुन कॉल करुन अक्षयच्या रडण्याचा ऐकवला. आवाज ऐकवून दोघंही अपहरणकर्ते पसार झाले. दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घरी धाव घेत शोधाशोध केली असता अक्षय शेजारच्या जंगलात हात, पाय, तोंड बांधलेल्या अवस्थेत झाडाला बांधलेला आढळला.
निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडणं म्हणजे राजकीय स्टंट आहे, विरोधीपक्षांनी केलेली खेळी की मतांसाठी केलेला बनाव, याचा तपास पोलीस करत आहेत.