Shivrajyabhishek Din 2022 : स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, परंतु, तो तह त्यांनी धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधनं घातली जातात तिथे थांबायचं नसतं, अशी महाराजांची शकवण आहे. शिवाजी महाराज यांनी देखील परक्यांशी  संघर्ष केला, पण स्वकीयांशी देखील त्यांना संघर्ष करावा लागला. यातूनच त्यांनी स्वराज्य निर्माण केले. हेच शिवाजी महाराज यांचं स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी रायगडावरून केला आहे. 


किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांना संबोंधित केले. कोरोनामूळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती राजकीय वक्तव्ये करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, मी आज राजकीय बोलणार नाही असे स्पष्ट करत संभाजी राजे यांनी यावेळी कोणाचेही थेट नाव घेतले नाही. परंतु, अनेक ऐतिहासिक दाखले देत राज्यसभा निवडणूकीवरुन आणि रायगडावरील सोयी-सुविधांवरुन राज्य सरकारवर नाव न घेता टीका केली.


"मागील दोन वर्षात कोरोनामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने झाला. त्यावेळी मी रायगडावर येऊ नका अशी हाक दिली होती आणि तुम्ही माझा शब्द ऐकला. हा छत्रपतींबद्दलचा विश्वास आहे, प्रेम आहे. रायगडावर कोणतीही सोय नसताना देखील शिवभक्त राज्याभिषेक सोहळ्याला हजर असता. त्यामुळे माझा सरकारला प्रश्न आहे की,  तुम्ही शिवभक्तांसाठी काय केलं? एसटी आम्हीच आणायची, पाणी आम्हीच आणायचं. सोय होत नसेल तर हा लढा इथूनच सुरु होईल. मग होऊन जाऊ द्या, असा इशारा संभाजीराजे यांनी यावेळी दिला.


संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नाराजीनंतर इतिहासातील दाखाला देत नाव न घेता ते म्हणाले, "राज्यभिषेक सोहळ्यानंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले. महाराजांच्या इतिहासातून आपल्याला काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. त्यांनी प्रस्तापितांऐवजी विस्तापितांना संधी दिली. शिवाजी महाराजांविरोधात अनेक शाह्या होत्या. अशातच शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिचा संकल्प केला होता.  परंतु, त्यांना अडवण्यासाठी बाप-लेकांमध्ये भांडणे लावली.  शहाजी राजेंवर मोठा दबाव होता. घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेक जण तेव्हा पुढे आले होते. शाहाजी राजे यांना आदिलशाहाने पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये शिवाजी महाराजांना घरात थांबवा नाही तर आपल्यात सामील करुन घ्या, असे सांगितले होते. परंतु, आपण यात पडत नाही, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, असे उत्तर शहाजी राजे यांनी दिले होते. शहाजी राजे यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करण्यासाठी मार्ग करून दिला. आणि शाहाजी महाराजांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया उभारला." 
 
"मी किल्ल्याचं संवर्धन जतन सुरु केलं असून राष्ट्रपतींना देखील शिवाजी महाराजांसमोर आणलं आहे. परंतु, मला कोणी सांगितले की, उद्या राजीनामा द्या तर मी लगेच देईन. मला फरक पडत नाही.  शिवाजी महाराज यांना मुघल दरबारात अपमानीत केले होते, त्यावेळी ते तिथून निघून गेले. आम्ही त्याच शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो. शिवाजी महाराज यांनी सांगितले होते की, जिथे आपल्या स्वाभिमानाला जागा नाही तिथे आपण थांबायचं नाही."