अहमदनगर : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अहमदनगरमधील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.


निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आजी-माजी आमदारांसह दोघा माजी नगरसेवकांचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक सचिन जाधव यांचाही शस्त्र परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केला आहे. केडगावमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन भाजप आमदार शिवाजी कर्डीले आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षकांनी या सहा जणांचे शस्त्र परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याने त्यांनी शस्त्रं बाळगणं आता अवैध झालं आहे.