Uday Samant : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) नारायण राणेंना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनाच लढणार असे वक्तव्य केल्याने नारायण राणेंना जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार आहे का? अशी चर्चा होत आहे. 


उदय सामंत म्हणाले की, सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करतात. ते म्हणाले की, लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. त्यामुळे आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. जागांची चर्चा आमचे तीन नेते मिळून करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे. त्यामुळे ती जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. 


शिवसेनेने जिथे जागा लढल्या तिथे दावा


ते पुढे म्हणाले की, प्रमोद सावंत काल आमच्या जिल्ह्यात होते. शिवसेनेने जिथे जागा लढल्या तिथे शिवसेनेचा दावा आहे. ते त्यांचे दुःख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडतील आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे मांडू. नाशिकचे ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला याबाबत उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की,  मला याबाबत फार काही माहिती नाही. 


जागा कुणी लढवाव्या हा निर्णय तिन्ही नेते घेतील


पश्चिम महाराष्ट्र जागा वाटपाबाबत उदय सामंत म्हणाले की, जागा कुणी लढवाव्या हा निर्णय तिन्ही नेते घेतील. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत उदय सामंत म्हणाले की, ही प्रशासकीय बाब आहे. बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांना असतात. त्यामुळे मी बोलणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


जे आमचे विरोधक आहेत त्यांनी असेच काम करावे


मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केलंय, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. यावर उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, नाना पटोले अजून काय वक्तव्य करणार, जे आमचे विरोधक आहेत त्यांनी असेच काम करावे, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आणखी एका जागेवर भाजपचा दावा, राणेंपाठोपाठ दुसरा केंद्रीय मंत्री इच्छुक