Shahaji Bapu Patil on Uddhav Thackray: काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांची केवळ ससेहोलपट होणार आहे. त्यामुळे यांचे एक दिवस भांडे फुटणार, असं म्हणत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackray) निशाणा साधला आहे. सभेतील गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठवलेली आहे, या गर्दीचं मतात रूपांतर होणार नाही, अशी टिकाही शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केली आहे. 


शहाजीबापू पाटील बोलताना म्हणाले की, सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाची स्वातंत्र्यपूर्व काळापासून कलुषित मतं असून आजवर सर्व काँग्रेसी विचारांच्या नेत्यांनी सावरकरांची अवहेलना आणि कुचेष्टा करून देशद्रोही ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर काँग्रेस आपले विचार बदलणार नाही आणि यातूनच एक दिवस हे आघाडीचं भांडं फुटेल.


काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे यांची अनेक मुद्द्यांवर ससेहोलपट होणार : शहाजीबापू पाटील


काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगळ्या विचारानं जाणारे पक्ष असल्यानं केवळ सावरकर हेच नव्हे तर इतर अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांची ससेहोलपट होणार असल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले. सध्या केवळ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याच्या रागातून झालेली ही एकजूट असून कोणत्याही राजकीय विचारानं ही आघाडी झालेली नसल्यानं हे भांडं लवकरच फुटेल, असा दावाही यावेळी शहाजीबापू पाटील यांनी बोलातना केला आहे. 


पाहा व्हिडीओ : Shajibapu Patil On Uddhav Thackeray : सभेतील गर्दी काँग्रेस राष्ट्रवादीने पाठवलेली



बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेनेच्या विचारांशी उद्धव ठाकरे प्रतारणा करतायत : शहाजीबापू पाटील


हिंदुत्वाचा विचार घेऊन स्वर्गीय बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेनेच्या विचाराशी उद्धव ठाकरे प्रतारणा करत असल्याची टीका करत सध्या सभेला होत असलेली गर्दी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मोठ्या संख्येनं पाठवलेल्या लोकांची असल्याचा टोलाही शहाजीबापू यांनी लगावला. सध्याच्या राजकीय घडामोडीवर उद्धव साहेब काय बोलतात हे ऐकायला येणारे काही असले तरी या गर्दीचं मतात रूपांतर होत नसतं, असा टोलाही शहाजीबापू यांनी यावेळी लगावला आहे. 


उद्धव ठाकरेंच्या सभेतून सुरु असलेली भाषणबाजी म्हणजे, फार मोठं राजकीय प्रबोधन नाही : शहाजीबापू पाटील


निवडणूक लागल्यानंतर सक्षम उमेदवार, कार्यकर्त्यांची फळी आणि पक्षाचा चांगला मजबूत अजेंडा यातून निवडणूक जिंकता येते, असे सांगत सध्या उद्धव ठाकरे यांच्या सभेतून सुरु असलेली भाषणबाजी म्हणजे, फार मोठं राजकीय प्रबोधन नाही, असा चिमटाही शहाजीबापूंनी यावेळी काढला आहे.