मुंबई : शिवसेना खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. 'सामना'मधील त्यांच्या 'रोखठोक' या सदरातून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आंदोलनजीवी' शब्दावरुन निशाणा साधला आहे. 'आंदोलने नकोत, मग काय हवे? लोकशाहीतले सुनसान रस्ते!' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली आहे. आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात मोठे ‘आंदोलनजीवी’
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह हे आज ‘आंदोलना’ची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शाहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले, असं त्यांनी म्हटलं आहे. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन ‘कॉर्पोरेट व्यवस्था’ आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकरी बदनाम केला जात आहे. ज्यांना आज शेतकऱ्यांचे आंदोलन नको आहे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तपासायला हवा. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर उतरला होता. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱ्यांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे ‘आंदोलनजीवी’ होते, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.


देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे संसदेत रडतात हा एक प्रकारचा विक्रम : संजय राऊत


पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली
त्यांनी म्हटलं आहे की, ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा आहे, असं संजय राऊतांनी लिहिलं आहे.


संजय राऊत यांनी लिहिलं आहे की, कायदेभंग, परदेशी कापडाची होळी, चले जाव, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांनी गांधीजींनी देश एका झेंडय़ाखाली एकवटवला, एकजिनसी केला. गांधीजींची उपोषणे हेसुद्धा आंदोलनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांच्या अस्मितेसाठी लढा दिला. ते आंदोलन नव्हते तर दुसरे काय होते? संसदेच्या आवारात अनेक पुतळे विराजमान आहेत. त्या प्रत्येक पुतळ्याला आंदोलनाचा इतिहास आहे. तो प्रत्येक पुतळा आता जिवंत होऊन सांगत आहे, ‘आम्ही आंदोलने केली म्हणून तुम्ही सिंहासनावर बसला आहात.’, असं त्यांनी म्हटलंय.


त्यांनी म्हटलं की, दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडले तेव्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आणि संसदेत आंदोलन करणारे भाजपचेच लोक होते. आता एखाद्या निर्भयावर अत्याचार झाला तर ‘हाथरस’प्रमाणे तिला अंधारात पोलीस गुपचूप जाळून टाकतील व त्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवतील. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहात आहे ते शेकडो करसेवकांच्या बलिदानातून. हे सर्व हुतात्मे परकीय हस्तक किंवा परजीवीच होते, असेच आता म्हणावे लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलंय.