साईबाबा संस्थानाचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2017 06:30 PM (IST)
शिर्डी : शिर्डी साईबाबा संस्थान राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करणार आहे. संस्थानाच्या विश्वस्तांची यासंबंधी आज बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शिर्डी साईबाबा संस्थानानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केल्यानं त्यांचं जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना रोजगारासाठी मदत केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं, तसंच शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठीही मदत देण्यात येणार आहे. व्यवसायाभिमुख साहित्य निर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचं साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली. यासोबत 10 मेगा वॅट सोलर पावर सिस्टम उभारण्याचा निर्णय आजच्या विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला. भक्तांच्या चालण्यातून फूट एनर्जी निर्माण करण्याचा निर्णयही आज साई संस्थानानं घेतला आहे. तसंच साई बाबांना येणाऱ्या फुलांपासुन साईरोज अगरबत्तीही बनवण्यात येणार आहे.