शिर्डी: साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय साई  संस्थान विश्वस्त मंडळानं घेतला आहे. त्यामुळे आता कुशल कर्मचाऱ्यांना १३ हजार ४२० तर अकुशल कर्मचाऱ्यांना १२ हजार १५१ रुपये वेतन मिळणार.


वेतनवाढीसोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतही वाढ करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साईबाबा संस्थानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज झालेल्या संस्थान विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे तब्बल 2700 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.