मुंबई: नागपूर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती. मात्र फडणवीसांना अटक होऊ नये म्हणून गोपीनाथ मुंडेंनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांकडे प्रयत्न केले, असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.


अर्थात ही त्यावेळची चर्चा होती, ते खरं की खोटं मला माहीत नाही, अशी पुष्टीही परब यांनी जोडली. मात्र नंदलाल समितीच्या अहवालात देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे, यावर मी आजही ठाम आहे, असंही परब यांनी नमूद केलं.

भुजबळांनी फडणवीसांना वाचवलं, मात्र त्याची परतफेड म्हणून त्यांनी भुजबळांनाच आत टाकलं, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

अनिल परब काय म्हणाले?

नंदलाल समतीच्या अहवालात तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांचं नाव होतं. त्यावर मी आजही ठाम आहे. नंदलाल समतीच्या यादीत 109 जणांची नावं होती, त्यात फडणवीसांचंही नाव होतं.

नंदलाल यांना आव्हान आहे, त्यांनी आजही सांगावं की पान नंबर 106 आणि 184 वरील उल्लेख त्यांनी लिहिला नाही हे जाहीर सांगावं.

महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही फडणवीसांनी तारखा बदलून सह्या घेतल्या. त्याला जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई करावी असं नंदलाल समितीने म्हटलं होतं. तसंच सुप्रीम कोर्टानेही फडणवीसांना क्लीन चिट दिलेली नाही. ते प्रकरण तसंच पडलेलं आहे.

पान नंबर 106 आणि 184 वरील उल्लेख मी लिहिला नाही असं, नंदलाल यांनी सांगावं, असं आव्हान मी त्यांना देतो, असं परब म्हणाले.

(अनिल परब यांनी केलेलं वक्तव्य - व्हिडीओ 39 .00 ते 44.00 )



मुंबई मनपात शिवसेनेवर आरोप नाही

दुसरीकडे मुंबई महापालिकेतील घोटाळ्याबाबत शिवसेनेवर आरोप केले जात आहेत, पण ते तथ्यहीन असल्याचा दावा अनिल परब यांनी केला. एसआयटीच्या अहवालात शिवसेनेच्या एकाही नेत्याचं, नगरसेवकाचं नाव नाही,असं परब म्हणाले.

संंबंधित बातम्या:

‘घोटाळ्यात फडणवीसांचा थेट हात नव्हता, पण...’


फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा : शिवसेना