शिर्डी: कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते आज शिर्डीत बोलत होते.


रावसाहेब दानवे आज शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

दानवे म्हणाले, "कर्ज माफ करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे, आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, अशाप्रकारचा ठोस प्रस्ताव द्यावा, मग त्यावर सरकार विचार करेल"

याशिवाय "आमच्यावर काय आरोप होत आहेत, याची आम्हाला चिंता नाही. आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर आहे", असंही दानवेंनी नमूद केलं.

एकीकडे काँग्रे-राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून राज्यभरात शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच असताना, दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची चिन्हं आहेत.

संघर्षयात्रेच्या माध्यमातून विरोधक सातत्यानं सरकारवर कर्जमाफी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळं विरोधकांवर टीका करताना दानवेंना त्यांचा अजब सल्ला महागात पडू शकतो.