Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय घडामोडींवा वेग प्रचंड वेग आलाय. गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील वातावरण तापले आहे, त्यावेळी भाजपने संयमी भूमिका घेतली होती. आता देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चेला उधाण आलेय. 


देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये आता गुवाहाटी आणि दिल्ली येथून हालचाली होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर मागील दोन दिवसांपासून भाजपचं लक्ष होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे आता 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यपालांकडे सह्यांचे पत्र जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस पुढील निर्णय घेऊ शकतात. 


एकनाथ शिंदे काय म्हणाले?
कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. आपलं सुख, दु:ख सारखंच आहे. विजय आपलाच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला या प्रकरणात क्लीन चिट दिला असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र, राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याची कबुली दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेय. त्यामुळे आता लवकरच एकनाथ शिंदे भाजपबरोबर सत्तास्थापनेचा दावा करु शकतात. 


राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधन करत भावनिक साद घातली. तुम्ही समोर येऊन बोला, मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडलं.  या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली. शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांसोबतच खासदारही शिंदेच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ठाणे आणि केडीएमसीमधील काही नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवलाय. आता एकनाथ शिंदे यांनी या बंडामागे भाजपचा सपोर्ट असल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलेय.