पुणे : भाजप-शिवसेना सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, पण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुण्यातील सभेत ते बोलत होते.


उद्धव ठाकरे म्हणतात भाजप गुंडांचा पक्ष तर, देवेंद्र फडणवीस म्हणतात शिवसेना खंडणीखोर पक्ष आणि सत्तेत तर मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली.

भाजपमध्ये गेलेल्या काही जणांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या कर्तबगार मंडळींचं स्वागत साक्षात देवेंद्र करत आहेत आणि त्यात फडणवीस म्हणजे पुणेकरांना परिचीत घाशीराम कोतवाल फेम नाना फडणवीस आहेत, असा खोचक टोला पवारांनी लगावला.

दरम्यान गेल्या 10 वर्षात पुण्याचा विकास केवळ राष्ट्रवादीमुळे झाला, असं सांगायलाही शरद पवार विसरले नाहीत. माहिती तंत्रज्ञान, वाहन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याने केवळ राष्ट्रवादीमुळे विकास केला, असं पवार म्हणाले.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्याची अधोगती सुरु आहे. त्यामुळे अरे कुठं नेवून ठेवला महाराष्ट्र माझा, असा सवालही पवारांनी केला.