Sharad Pawar : देशात बदलाचे वातावरण (Sharad pawar) तयार होताना दिसत आहे. सध्या झालेल्या पदवीधर निवडणुका जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकसुद्धा जागा मिळू शकली नाही. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेते शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. 


'पुण्यातील लोक वेगळा विचार करत आहेत'


कसबा पोटनिवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. कसब्यात भाजपचं वर्चस्व असलेल्या दोन प्रभागात कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जास्त मतं पडली आहे. त्यावरही शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की कसब्यात धंगेकरांना दोन ठिकाणी जास्त मतं मिळाली आहे. हा बदल पुण्यात होत आहे. याचाच अर्थ लोक वेगळा विचार करण्याच्या टप्प्यावर आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


'नागालँडच्या जनतेचे आभार'


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये 12 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी पक्ष आहे. त्यांच्या सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्ष हे राष्ट्रवादीच्या व्यक्तीकडे आहे. आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी वाधवान यांना नागालँडमध्ये पाठवले आहे. तिथे काय करावं यासंबंधीची माहिती घेऊन त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असं म्हणत त्यांनी नागालॅंडच्या जनतेचे आभार मानले आहेत. 


'निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल हा चांगला निर्णय'


सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकाऱ्यांनी उभ्या केल्या होत्या त्या निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत. पंतप्रधान आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेत्याचाही यात समावेश व्हावा. हा लोकशाहीमधील चांगला निर्णय आहे, असंही ते म्हणाले. 


'कांद्याच्या प्रश्नाबाबत शिंदे-फडणवीस सरकार अपयशी'


मी दोन दिवसापूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. यावेळी मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती दिली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे.