नागपूर : मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते तेव्हा चार वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले. नागालँडमधून आम्ही शेजारच्या देशात गेलो, मात्र कधीही गवगवा केला नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  गौप्यस्फोट केेला.  ते नागपुरात बोलत होते.


पवार म्हणाले, " देशाच्या सीमेवर वेगळी परिस्थिती आहे. उरी हल्ल्याची घटना देशवासियांना एक जखम आहे. तो एक धक्का होता. चीड़ आणणारी घटना होती. त्याला जबरदस्त उत्तर देण्याची गरज होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला. आपल्या कमांडोंनी हेलिकॉप्टरने जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आम्ही त्या कारवाईला साथ दिली. सरकारला साथ दिली. राजकारण केले नाही.आम्ही सरकारचं अभिनंदन करतो. पण एकच गोष्ट माझ्या सारख्याला खटकते. मी संरक्षण मंत्री होतो. त्याची वाच्यता करायची नसते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 4 वेळेला सर्जिकल स्ट्राइकसारख्या कारवाया केल्या, पण कधीही गवगवा केला नाही".

सध्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर गवगवा सुरु आहे. त्यामुळेच मोदींनी काल सहकाऱ्यांना दर्डावल्याचं पवार म्हणाले.



अॅट्रॉसिटीत बदल नको

"आज राज्यात अनेक शहरात मराठा मोर्चे निघत आहेत. आरक्षणची मागणी केली जात आहे. अॅट्रॉसिटी कायदा बदलाची मागणी होत आहे. मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द नको, अॅट्रॉसिटीमध्ये बदल नको, पण त्याचा गैरवापरही व्हायला नको ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तरतूद करावी", अशी मागणी शरद पवार यांनी केली.

प्रस्थापित विस्थापित होऊ शकतो

मुख्यमंत्री म्हणतात मोठे मोर्चे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असे आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे, ज्यांना तुम्ही विस्थापित म्हणता, ते आज कुठेच पदावर नाहीत. मात्र पाच वर्षांनी पदावर येऊ शकतो. आणि प्रस्थापित विस्थापित होऊ शकतो, असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

ज्या शेतकऱ्यांचं सोन्यासारखं पीक पावसाने नष्ट होतं, तो विस्थापित होतो. त्यांचे हे मोर्चे आहेत, असंही पवार म्हणाले.

आरक्षणासाठी केंद्राशी चर्चा करा

लोक म्हणतात की 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण  देता येत नाही.  मात्र तामिळनाडूमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त आरक्षण आहे. आरक्षणाबाबत केंद्रासोबत चर्चा केली पाहिजे, असंही पवारांनी नमूद केलं.

कोपर्डी बलात्काराचं चार्जचीट अद्याप का दाखल नाही?

मुख्यमंत्री म्हणाले होते कोपर्डी बलात्कारप्रकरणाचं आरोपपत्र  एक महिन्यात दाखल होईल. मात्र घटना घडून तीन महिने होत आले, तरीही अद्याप आरोपपत्र का दाखल झालं नाही, असा सवाल पवारांनी केला.

सरकारवर नागरिकांचा विश्वास नाही

ज्या सत्तेबद्दल लोकांना विश्वास असतो, तिथे लोक रस्त्यावर उतरत नाही. मात्र, जिथे विश्वास नसतो तिथे लोक रस्त्यावर उतरतात. या सरकारबद्दल नागरिकांना 2 वर्षातच विश्वास झालाय की हे आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यामुळेच ते रस्त्यावर उतरलेत, असं पवार म्हणाले.

....तर वेगळ्या विदर्भाला विरोध नाही

यावेळी वेगळ्या विदर्भाबाबत बोलताना पवार म्हणाले," विदर्भातील लोकांची इच्छा महत्वाची आहे. लोकांची वेगळ्या विदर्भाची मागणी असेल, तर आमचा त्याला विरोध नाही".