नाशिक : भाजप सरकार पुढचे तीन वर्षही आरामात काढेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. तसेच कर्जमाफीच्या दिरंगाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस 25 नोव्हेंबरनंतर रस्त्यावर उतरेल, असा इशाराही पवारांनी दिला.


“सामनामधून रोज मी नवनवीन वाचतो. पण शिवसेनेची भूमिका अजून मला समजलेली नाही. त्यामुळे भाजपचं सरकार पुढची दोन वर्ष आरामात काढेल,” असं शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच, सेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल का? या प्रश्नावर त्यांनी आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सांगितलं.

उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीबद्दल विचारले असता, “ही भेट राजकीय नसून, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी झाली,” असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शेतकरी कर्जमाफीवरुनही शरद पवारांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. “सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस 25 नोव्हेंबरनंतर रस्त्यावर उतरणार,” असा इशारा पवारांनी यावेळी दिला. तसेच, भाजप सरकारच्या 'मी लाभार्थी' जाहिरातीवरुनही पवारांनी टोला लगावला.

दरम्यान, केंद्र सरकारच्या जीएसटी काऊन्सिलने जीएसटीमध्ये केलेले बदल हे गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.