Shalini Patil on Sharad Pawar Resigns, Ajit Pawar: शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीचा निर्णय खूप घाईत घेतला, असं मत माजी आमदार शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं त्या म्हणाल्या आहेत. तसंच अजित पवार (Ajit Pawar) घोटाळेबाज आणि गुन्ह्यांखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, अशी घणाघाती टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे. तर अजितदादांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणूनच ईडीकडून अद्याप एकदाही अजितदादांची चौकशी झाली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. 


अजित पवारांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात : शालिनीताई पाटील 


"जर पुढचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळे यांनाच बनवावं. कारण ती याच्यासाठी सक्षम आहे. अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्ह्याखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं हे चुकीचं ठरेल.", असं म्हणत शालिनी पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "आमदार हसन मुश्रीफ यांना 100 कोटीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलवते, पण अजित पवार यांना 1400 कोटींच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात का बोलवत नाही? अजित पवार यांच्या पाठीशी भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणून त्यांना सावली भेटत आहे आणि कुठल्याही चौकशीसाठी  त्यांना बोलवणं येत नाही. अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते. एवढे त्यांच्यावर गुन्हे आणि आरोप आहेत." 


पाहा व्हिडीओ : Shalini Patil on Ajit Pawar : जरंडेश्वर कारखाना ते अजितदादा,शालिनीताईंचे थेट आरोप



निवृत्ती घोषित करण्यात शरद पवारांनी घाई केली : शालिनीताई पाटील 


शरद पवारांच्या निवृत्तीबाबत बोलताना शालिनीताई म्हणाल्या की, "पवार यांनी सर्व राष्ट्रवादींच्या नेत्यांबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला पाहिजे होता. पवार यांनी जरी निवृत्ती होण्याचा निर्णय घेतला असेल तरीही समितीचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हा मानला जाणार नाही. माझे वय आता 90 वर्षे आहे आणि आणि ते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते तर त्यांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती."