कोल्हापूर/नवी मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना पनवेल कोर्टाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रेंसोबत घातपात केला असल्याची शक्यता पोलिसांनी कोर्टात मांडली.


अश्विनी गायब झाल्यानंतर अभय कुरुंदकर यांनी भाईंदर मधील घराचा रंग बदलला. रंग का बदलला, काही आक्षेपार्ह घटना घडली आहे का, याचा पोलिसांनी कोर्टासमोर संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर घरातील रंग, भिंतीचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पाठवल्याची माहिती कोर्टात देण्यात आली आहे.

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत


बेपत्ता होण्यापूर्वी अश्विनी यांनी विपश्यनेसाठी जाणार असल्याचं आपल्याला सांगितलं होतं, असं अभय यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र राज्यातील आणि परराज्यातील विपश्यना केंद्रात तपास केला असता अश्विनी यांचा कोणताच थांगपत्ता न लागल्याने संशयाची सुई अभय कुरुंदकर यांच्याकडे जात असल्याचं एसीपी प्रकाश निलेवाड यांनी कोर्टात सांगितलं.

बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण


एक वर्ष तपास सुरु असून कोणताही ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. मात्र 'एबीपी माझा'वर अभय कुरुंदकर अश्विनी बिद्रेंना मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फूटेज दाखवल्यानंतर पोलिसांनी दबावाखाली येऊन अभय कुरुंदकर यांना अटक केल्याचा दावा त्यांच्या वकीलाने कोर्टासमोर केला.

व्हिडीओ :



पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण

गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागला आहे. रत्नागिरीत राहत असताना अश्विनी यांच्या फ्लटॅमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. ‘माझा’ला मिळालेल्या या व्हिडीओसारखेच अनेक व्हिडीओ बिद्रे कुटुंबीयांनी पोलिसांकडे सादर केले. पण त्यानंतरही ऑन ड्युटी असलेल्या कुरुंदकर यांना अटक का होत नाही, असा सवाल बिद्रे कुटुंबीयांनी केला होता.

नेमकं काय प्रकरण आहे?

15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तपासात पोलिसच त्याना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.
एपीआय अश्विनी गोरे दीड वर्षांपासून बेपत्ता, वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.

अश्विनी आणि अभय यांच्यात वाद

यावेळी अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले. गेल्याच महिन्यात ते पुन्हा रुजू झाले होते.