जळगाव : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर उघडपणे हल्ला चढविला असून ही अतिशय दुर्दैवी गोष्ट असल्याचं मत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात जे काहूर उठले आहे ते अतिशय चिंताजनक आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ती आत्महत्या आहे, की त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले की हत्या असा विषय घेऊन बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर ज्या उघडपणे हल्ला चढविला आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. पुढील काळात या गोष्टीचे दूरगामी परिणाम होणार आहेत, असं उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.


उज्वल निकम यावेळी म्हणाले की, यापुढे एखाद्या गुन्हेगाराला लपायचं असेल तर त्याला विदेशात जायची आवश्यकता राहिली नाही. कारण तो जर बिहारमध्ये जाऊन लपला तर बिहार पोलीस महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करणार नाहीत आणि बिहारचा गुन्हेगार महाराष्ट्रात लपला तर महाराष्ट्र पोलीस सहकार्य करतील का? असा प्रश्न आता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर निर्माण झाला आहे.

"पिता म्हणून मला सुशांतची सर्व माहिती असणं गरजेचं आहे", सुशांतच्या वडिलांचा रियाला व्हॉट्सअॅप मेजेस

सुशांत सिंह मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र त्या चौकशीची फलनिश्पत्ती काय निघाली हे त्यांनी जाहीरपणे उघड केलं नाही. त्यामुळेच बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर उघडपणे हल्ला सुरू केला आहे, मुंबई पोलिसांनी याबाबत शांत राहणे, यावरून बिहार पोलिसांनी ओरड सुरू केली आहे. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. कायदा असं सांगतो ज्या ठिकाणी गुन्हा घडतो, त्या ठिकाणच्या न्यायालयाला तो खटला चालविण्याचा अधिकार आहे. मात्र आज ही बाब न्याय प्रविष्ट असल्याने मी याबाबत बोलणार नाही,असं निकम म्हणाले.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

या घटनेबाबत बिहारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रसार माध्यमात येऊन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातून महाराष्ट्र पोलिसांच्या बाबत जनतेत संशय निर्माण होईल अशी वक्कव्यं करू लागले आहेत, ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. या अशा वक्तव्यांमुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं, त्यामुळं अशा अधिकाऱ्यांना बिहारच्या राज्यकर्त्यांनी आवर घालावा असं मत देखील उज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.