मुंबई : राज्यात 98 टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा दावा किती खरा, किती खोटा हे तुम्ही (प्रेक्षक-वाचकांनीच) तपासायचं आहे. त्यासाठी एबीपी माझाने खास #सेल्फीविथखड्डा ही मोहीम आणली आहे.


खड्डा हा जणू रोजच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक झाला आहे. कारण घरातून निघाल्यापासून ते परत येईपर्यंत खड्डे काही आपली पाठ सोडत नाहीत. दररोज कुणाचा तरी जीव जातोय तर कुणाचा अपघात होतो. मात्र चांगल्या रस्त्यांची आणि खड्डे बुजवण्याची आपल्याला आश्वासनंच दिली जातात.

राज्यातील सर्व रस्त्यांवरचे खड्डे बुजवल्याचे दावे किती खरे आहेत, किती गावं, किती शहरं खड्डेमुक्त झाली आहेत, हे सरकारला यातून दाखवून देता येईल. यासाठी तुम्ही तुमच्या विभागातल्या खड्डयांसोबत एक सेल्फी काढून आम्हाला पाठवायचा आहे. आम्ही त्याला एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रसिद्धी देऊ.

एबीपी माझाला फोटो कसा पाठवाल?

तुमच्या भागातील रस्त्यांवर खड्डे असल्यास, त्या खड्ड्यासोबतचा सेल्फी एबीपी माझाच्या @abpmajhatv या ट्विटर हँडलला टॅग करुन ट्वीट करा. या ट्वीटमध्ये रस्त्याचं, किंवा तुमच्या भागाचं नाव असणं गरजेचं आहे. जसं की, परभणी-गंगाखेड रोडवरील रस्त्याचा फोटो असेल, तर त्या रस्त्याचं नाव आणि नेमका कोणत्या ठिकाणचा फोटो आहे, त्याचा उल्लेख करावा.