Sanjay Shirsat On Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त वक्त्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लीम होते असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केल्याने राज्यातच नाही तर देशभरात संतापाचे वातावरण आहे. तर, यावरुन अनेक राजकीय प्रतिकिया देखील येत असून, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील यावरुन भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. भिडे यांचे वक्तव्य समाजासाठी हानिकारक असून, त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल असे शिरसाट म्हणाले आहेत. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, “संभाजी भिडे कोणाचे पिल्लू आहे, काय आहे याबद्दल मी बोलणार नाही. पण, माझे देखील वैयक्तिक मत आहे की, भिडे गुरुजी यांनी असे वादग्रस्त वक्तव्य करु नयेत. प्रत्येकवेळी जायचे आणि काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचे. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात असे म्हणणे कोणतं लॉजिक आहे. तुमचा कोणीतरी सन्मान करत असेल किंवा तुम्हाला मानत असेल तर तुम्ही काहीही जे तोंडात येईल ते बकणे योग्य नाही. त्यामुळे मी देखील त्यांचे निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील सांगणार आहे की, अशाप्रकारे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांवर एकदा तरी कारवाई झाली पाहिजेच. जेणेकरुन हे लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाहीत, असे शिरसाट म्हणाले. 


भिडे यांच्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. त्यांचे मूळ नाव काय, संभाजी भिडे वैगरे कसे झालेत या वादात मला पडायचे नाही. मात्र, त्यांचे वक्तव्य समाजातील सर्व लोकांसाठी हानिकारक आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी माझी विनंती राहिल. तर, भिडे यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. असे चालणार नाही. कारण, माझ्यासारख्या व्यक्तीने असे वक्तव्य केले म्हणून मी सत्तेत असल्याने कारवाई होणार नाही का?, अशातला भाग नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीच भेदभाव करत नाहीत. मग तो कोणीही असो. त्यामुळे भिडे यांच्यावर कारवाई केली जाईल असे मला वाटते, असे शिरसाट म्हणाले. 


वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच 


संभाजी भिंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबता थांबत नाही. आधी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, त्यानंतर आता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लीम होते असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांच्याकडून करण्यात आली आहे. यावरुन वाद सुरु असतानाच शनिवारी पुन्हा एक वक्तव्य भिडे यांनी केले आहे. अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांचे नखाएवढेही योगदान नसल्याचे वक्तव्य भिडे यांनी केले आहे. त्यामुळे देशभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध केले जात असून, संतापही व्यक्त केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


भिंडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज ठाकरेंची महात्मा गांधीवरील 'ती' पोस्ट मनसेनं पुन्हा केली रिशेअर