मुंबई : कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. "मी बेळगावला जाणारच आहे. मला कायद्याने रोखा," असं आव्हानच संजय राऊत यांनी पोलिसांना दिलं आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या हस्ते आज बेळगावात नाथ पै व्याख्यानमालेचं उद्घाटनही होणार आहे.


शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील यड्रावकर काल (17 जानेवारी) बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. परंतु अभिवादन करण्याच्या स्थळापासून दहा फूट अंतरावर पोलिसांनी यड्रावकर यांना हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास अटकाव करुन धक्काबुक्की केली. यावेळी मंत्र्यांचे सहकारी आणि पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर पोलिसांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एका खासगी वाहनातून पोलीस आयुक्तालयाकडे नेले आणि तिथून त्यांना कोगनोळी इथे नेऊन सोडलं.

कर्नाटक पोलिसांकडून दडपशाही, गनिमी काव्याने बेळगावात पोहोचलेल्या मंत्री यड्रावकरांना ताब्यात घेतले

यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्नाटक सरकारने संजय राऊत यांना बेळगावात येण्यास बंदी घातली आहे. मात्र मी बेळगावात जाणारच अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. "बेळगाव हे हिंदुस्तानात आहे. मी राज्यसभा खासदार आहे. त्यामुळे मला तिथे जाण्याचे अधिकार आहेत. कर्नाटक सरकारला मला रोखायचं असंल तर कायद्याने रोखावं," असं संजय राऊत म्हणाले. "बेळगावमधील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यमंत्री यड्रावकर गेले होते. मात्र त्यांना कानडी सरकारने धक्काबुक्की केली असून अटक केली आहे. हे कृत्य योग्य नसून गेल्या अनेक वर्षापासून कानडी सरकारचे हे कारनामे सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन
17 जानेवारी 1956 रोजी सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, महिला आघाडी आणि युवा समितीतर्फे अभिवादन करण्यात आलं. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, समितीचे नेते किरण ठाकूर, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडी अध्यक्ष रेणू किल्लेकर, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांच्यासह अनेकांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. नंतर रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोड या मार्गावरुन फेरी काढाण्यात आली. अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. नंतर मोर्चाचे रुपांतर हुतात्मा चौक इथे सभेमध्ये झालं.