मुंबई : सिनेट निवडणुका (Senate Election)  घेण्यासाठी घाबरणारे पंचायतींवर दावा सांगतात. हिंमत असेल तर पालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे.  ग्रामपंचायत निवडणुका पक्ष, चिन्हावर लढवल्या जात नाहीत.  सरकारमधील लोकांना हे माहिती नसेल तर  हे अडाण्यांचं सरकार आहे.  सिनेट निवडणूक घेण्यास घाबरणारे पंचायतीवर
दावा सांगतात, असेही संजय राऊत म्हणाले.  


संजय राऊत म्हणाले,  मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकानंतर फटाके घटनाबाह्य सरकार वाजवते ते फुसके आहेत. निकालाचे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत  हा मूर्खपणा आहे. ग्रामपंचयत निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाही हे जर घटनाबाह्य सरकारला माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. हे अनाडी घोडे उधळलेले आहेत.  जे  राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे.


14 महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग बोला


 14 महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिकासह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं ?  ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे.  आता फक्त आकड्यांचेच खेळ चालू आहेत 50 खोके 40 खोके. सिनेटच्या  निवडणुका  जाहीर झालेले असताना तुम्ही रडीचा डाव खेळत आहात. त्यांचा एक पक्ष आणि एक निवडणूक अस ठरतंय


हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ  महादेव अॅपचे मेंबर 


लालूप्रसाद यादव म्हटले आहेत की जर मी भाजपमध्ये गेलो तर मी हरिश्चंद्र झालो असतो. महादेव ॲपमध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर आहेत. ज्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं त्यांची आता पूजा केली जाते. देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्यावर फुले टाकतात. गोंदिया मध्ये तुम्ही बघितला असेल प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचे स्वागत केले आहे.  इकबाल मिरची सोबत संबंध असल्याचा आरोप प्रफुल पटेलांवर यांनीच केला होता आता तेच हातात हात घालून चालत होते हे सगळे महादेव अँप कमाल आहे. 


जातीपातीच्या नावावर राज्य फोडण्याचा षडयंत्र


मराठा आरक्षण  हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचा एक षडयंत्र सुरू आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जातोय आणि यामुळे या ठिकाणचा रोजगार उद्योग हे बाजूच्या राज्यामध्ये जावे यासाठी टाकलेले डाव आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी या डावांमध्ये फसू नये आणि या राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.