Statue of Chhatrapati Shivaji Maharaj on India Pakistan Border : भारताचा (India) कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) आता कापरं भरणार आहे. तसेच, भारताविरोधात कुरघोड्या करण्यापूर्वी पाकिस्तानला आता एकदा नाहीतर 10 वेळा विचार करावा लागणार आहे. कारण जम्मू काश्मिरमधील (Jammu & Kashmir) कुपवाड्यात (Kupwara) छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते पार पडलं. 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार श्रीनगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण आज पार पडलं. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत. आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे उभारण्यात आला आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची वैशिष्ट्य 


कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडेदहा फुट उंचीचा आहे. तो जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 x 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. 


कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचं भूमीपूजन भारतीय सेनेच्या 'राष्ट्रीय रायफल्स'च्या 41व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते 20 मार्च 2023 रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानानं बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला आहे. 'आम्ही पुणेकर' या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याची संकल्पना ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे 2200 किमी अंतर पार करण्यासाठी एक आठवडा लागला. 



कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशी करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 बाय 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.


पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेनं असावं अशापद्धतीनं पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 1800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन या बाबी पाहता पक्कं बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे. 


पुतळा उभारण्याची घोषणा करण्यापूर्वी काय म्हणालेले मुख्यमंत्री?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल."