मुंबई : अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर आता या मुद्द्यावरुन चांगलच राजकारण पेटलं आहे. वाघिणीवर 13 जणांचा बळी घेतल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या चार वर्षात झालेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे, तर मग या सरकारलाही गोळ्या घालायच्या का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


वाघिणीचे दोन बछडे आपल्या आईची वाट पाहत आहेत. त्यामुळे ही मातृहत्या असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.  दरम्यान केंद्रीय मंत्री आणि प्राणीप्रेमी असलेल्या मनेका गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलच धारेवर धरलं होतं. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारच्या वनविभागाने केलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला होता.

वाघिणीच्या हत्येनं मी अत्यंत दु:खी आहे. हा सरळसरळ गुन्हा असून, वाघिणीच्या बचावासाठी अनेकांनी आवाहन करुनही वनमंत्री मुनगंटीवारांनी थेट तिच्या हत्येचे आदेश दिले. वाघिणीच्या हत्येनं दोन निष्पाप बछड्यांना त्यांच्या आईच्या पश्चात मरणाच्या दारात नेऊन ठेवल्याचं मनेका गांधी म्हणाल्या होत्या.