Sanjay Raut on Nawab Malik : केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची 20 वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीचे लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठिक आहे. चौकशी होईल आम्ही वाट पाहतोय. नक्कीच संध्याकाळी ते घरी येतील. आताच माझं वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची. चौकशी पण कशी हे 20 वर्षांनी करत आहेत. 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण, 25 वर्षांपूर्वीचं प्रकरण."


ईडीची पथकं फक्त महाविकास आघाडी पुरतीच मर्यादीत? : संजय राऊत 


"किरीट सोमय्या यांनी काही प्रकरणं ईडीकडे दिली आहेत. भाजपच्याच नेत्यांची, आज जे भाजपमध्ये मंत्री आहेत, त्यांची अनेक प्रकरणं. भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा, त्याच्यासाठी हा शब्द चांगला आहे. कारण त्यांना मी काहीही बोललो तर वाटतं मी शिवी दिली. हे जे महात्मा आहेत, त्यांनी ईडीकडे अनेकांची प्रकरणं दिली आहेत. त्यांना का समन्स दिलं गेलं नाही? त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी का नाही पोहोचले? आता ही सगळी प्रकरणं आम्ही पुन्हा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. ज्या तक्रारी आधी केलेल्या आहेत, त्याचं पुढे काय झालं? का ईडीची पथकं फक्त महाविका आघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादवांचा पक्ष, लालू यादवांचा पक्ष यांच्यापुरतीच मर्यादीत आहेत?", असं संजय राऊत म्हणाले आहेत. 


2024 पर्यंत हे सगळं चालेल. त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत : संजय राऊत 


"2024 पर्यंत हे सगळं चालेल. त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, असा अप्रत्यक्ष इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे. तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "जे भाजपचे विरोधक आहेत किंवा जे सत्य बाहेर आणतायत. त्यांच्याचमागे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात. पण आम्ही घाबरत नाही. ही लढाई सुरुच राहिल, त्यांना येऊ द्या, तपास करु द्या. कितीही बनावट करु द्या, शेवटी सत्याचा विजय या देशात होत असतो. प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे. आताच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. अनेक विषयांवर चर्चा झाली. सोपं नाही. 2024 नंतर जे काही घडणार आहे, त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी.", असं संजय राऊत म्हणाले. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha