Sanjay Raut Letter To kirit Somaiya : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पत्र लिहलंय. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली 700 कोटींच्या निधीबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सोमय्यांना हे पत्र लिहलं आहे. 11 ऑक्टोबरला संजय राऊतांनी हे पत्र लिहलं होतं. 


भाजपची सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमधला घोटाळा हे तर पहिलं नाव आहे. अशी आपण 100 नावं जाहीर करणार आहे, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. याविषयी कालच संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना पत्र लिहिलं. या घोटाळाप्रकरणी ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचं आव्हान केलं आहे. तसेच, सोमय्या या माहितीच्या आधारे ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करतील, अशी संजय राऊत यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आव्हानही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे.



संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलंय?


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पत्र ट्वीट केलं असून त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे. 'घोटाळायोद्धा असलेले किरीटी सोमय्या यांना हे पत्र पाठवलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत 700 कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराची माहिती या पत्रात दिली आहे. आशा आहे की ते ईडीकडे पाठपुरावा करतील'


पत्रात संजय राऊत यांनी म्हटलं आहे, पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात झालेल्या अंदाजे 500 ते 700 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीची चौकशी करा आणि पुढील चौकशी आणि आवश्यक कारवाईसाठी ईडी/सीबीआयकडे पाठवा.


किरीटजी, भ्रष्टाचार उघड करणारे व्यक्ती अशी तुम्ही स्वत:ची प्रतिष्ठा निर्माण केली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही भ्रष्टाचार उघड करत आहात, सरकारी पैशाचा आणि मालमत्तेचा गैरवापर कसा करतात हे शोधण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे अनेक सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. 


त्यामुळे जेव्हाही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा सरकारी पैशाचा गैरव्यवहार होतो. तेव्हा तुमचा विचार येतो. अलीकडेच माझ्या निदर्शनास एक अत्यंत गंभीर प्रकरण आलं आहे. माझ्या पिंपरी चिंचवड दौऱ्यादरम्यान अलीकडेच श्रीमती सुलाभा उबाळे आणि इतर काही सदस्यांनी मला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या गंभीर गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराचे पर्दाफाश करणारे अनेक दस्तऐवज दिले.


2018-19 च्या कालावधीत स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध प्रकल्पांसाठी अनेक कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. या निविदेतील अटी आणि शर्तीं काही ठराविक कंपन्यांचे हित लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या होत्या. जसं की क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. आणि आर्कस या दोन कंपन्यांच्या 500  कोटींपेक्षा जास्त किमतीच्या निविदा मंजूर करण्या आल्या.


मात्र ज्या कामासाठी या कंपन्यांनी पैसे घेतले होते, त्यापैकी 50 टक्केही काम पूर्ण झालं नसल्याचं लक्षात येत आहे. हा सरकारने दिलेल्या पैशाचा गैरवापर आहे. 


संजय राऊत नेमका कुठल्या प्रतीचा गांजा घेतात : अतुल भातखळकर 


अतुल भातखळकर बोलताना म्हणाले की, "संजय राऊत नेमका कुठल्या प्रतीचा गांजा घेतात? पिंपरी चिंचवड मधील तथाकथित घोटाळा बाहेर काढण्याचा अधिकार नगर विकास खात्याकडे येतो. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली पाहिजे, महाराष्ट्रात एसीबी आहे. त्यांच्याकडे तक्रार केली पाहिजे. पण संजय राऊत यांना सध्या काहीही कळत नाही. संजय राऊत यांना खात्री पटलेली आहे की, त्यांचं सरकार घोटाळ्यांची चौकशी करू शकत नाही. म्हणून ते किरीट सोमय्या आणि ईडीला पत्र लिहीत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "वृक्षलागवड चौकशीचं काय झालं? फोन टॅपिंग, जलयुक्त शिवारच्या चौकशीचं काय झालं? मोहन डेलकर आत्महत्या चौकशीचं काय झालं? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यायला हवं"


महत्त्वाच्या इतर बातम्या :