Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीवर खळबळजनक आरोप केले आहेत. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे पत्र माहितीसाठी ट्रेलर अजून बाकी आहे, असं राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावे मोठमोठे घोटाळे आहेत. केंद्र सरकारमुळे आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे.


'आमच्या मागोमाग तुम्हालाही कोठडीत जावं लागेल'


आपण उपराष्ट्रपतींना पत्र लिहिल्यानंतर प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याला फोन केल्याचा गौप्यस्फोटही राऊतांनी केला आहे. आपण कोणत्या दडपशाहीला जुमानत नाही असे सांगत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. राऊत म्हणाले 'केंद्रीय तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडिकेटचा भाग झाल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आर्थिक घोटाळे सुरु आहेत. विरोधक वारंवार सांगत आहेत की तुम्हाला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल. मात्र, त्याच कोठडीत आमच्या मागोमाग तुम्हालाही जावं लागेल.'



 


'सरकार पाडण्याची ऑफर नाकारली म्हणून...'


संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha