सांगली : केंद्र सरकारने जारी केलेला 21 दिवसाचा लॉकडाऊन संपण्याच्या मार्गावर असताना आता आणखी 15 दिवस काही राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आता राज्यात देखील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा आकडा पाहून 3 झोन तयार केले आहेत. यात महाराष्ट्रामधील 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यात रेड झोन जारी केला आहे. या रेड झोनमध्ये  सांगली जिल्ह्याचा समावेश केला असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सांगलीत रुग्ण संख्या झपाट्याने कमी करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झालं आहे. मात्र जिल्ह्यातील सद्य परिस्थिती पाहता जिल्ह्याला रेड झोनमध्ये टाकण्याचे आवश्यक नसल्याचे सांगत काही नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही नागरिकांनी ज्या कोरोनाबधितांच्या संपर्कात जे जे लोक आलेत त्याची तपासणी करून त्याचे रिपोर्ट येत नाही तोवर लॉकडाऊन तंतोतंत पाळला जावा असं मत व्यक्त केलं आहे.


पूर्ण जिल्ह्यात प्रशासनाने अभूतपूर्व काळजी घेऊन इथं कुठंही कोरोनाचा प्रसार होऊ दिला नाही. फक्त इस्लामपूर येथे एकाच घरात रुग्ण आढळून आले तेही बरे होत आहेत. त्यात सरकारने लॉकडाऊन हे 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. तेही योग्य आहे मात्र रेड झोन मधील जिल्ह्यांना 30 एप्रिलनंतर परत लॉकडाऊन दिला गेला तर मात्र अवघड होईल, असं नागरिकांचं म्हणणं आहे.


विशेषतः सांगली-मिरज-कुपवाड शहर हा भाग व्यापाराच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावा लागेल. आधीच महापुराने इथले व्यापारी देशोधडीला लागले आहेत. त्यावेळी बाजारपेठ एक महिना बंद राहिली आहेच. अजूनही व्यापार नियमित झालेले नाहीत. त्यात लॉकडाऊनमुळे व्यापारी भवितव्य अक्षरशः अंधारात आहे. असं आजमितीला जाणवू लागलं आहे. निश्चितच रेड झोन घालताना काही निकष विचारात घेतले असतीलयात दुमत नाही,  पण त्यानंतर मात्र व्यापारी समाजाला परत उभारी घेण्यासाठी मोठे सहकार्य आणि मदत लागणार आहे. निश्चितपणे सरकारसुद्धा आर्थिक अडचणीत आहे. अशा प्रसंगी किमान उभे राहण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा देत चर्चेतून मार्ग काढणं आवश्यक आहे, असे व्यापारी वर्ग आणि काही नागरिकांची मतं आहे.


इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आले होते.  त्यामुळे संपर्कात आलेल्या लोकांची जोवर तपासणी होत नाही आणि त्यांचे रिपोर्ट येत नाहीत तोवर जिल्ह्यामधील लॉकडाऊन आवश्यक आहे असं काही नागरिकांचे म्हणणे आहे.  कारण या  रुग्णांच्या संपर्कात आले लोक सध्या सायलेंट रुग्ण असू शकतात जर पुन्हा लोक गर्दी करू लागले तरपुन्हा रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे जोवर जिल्ह्यातूनसंशयितांचे रिपोर्ट तपासले जात नाहीत तोवर यांचा पर्याय योग्य असल्याचे नागरिकांनी सांगितले.



रेडझोनबाबत सरकारकडून अजून आदेश नाहीत


 सांगली जिल्हा प्रशासनाने मात्र जिल्ह्यातल्या रेडझोनबाबत सरकारकडून अजून आदेश आले नसल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आणि त्याबाबतचे अपडेट आम्ही राज्य सरकारला कळवले असून सध्याची परिस्थिती पाहता इस्लामपूर वगळता जिल्ह्यातील बाकीच्या भागाला  दिलासा मिळू  शकतो, मात्र जिल्हाबंदी ही कायम राहील असं जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे.


सध्या 26 मधील 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यामध्ये केवळ एकच  रुग्ण आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पालकमंत्री जिल्ह्याला रेड झोनमध्ये न घेण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करू शकतात. मात्र सध्या तरी अधिकृतरित्या कोणताही जिल्हा कोणत्याही झोनमध्ये राज्य सरकारने घोषित केलेला नाही. अजून केंद्राने तशा सूचना काढलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश रेड झोनमधून वगळणार का नाही? याबाबत अजून संभ्रम आहे.