सांगली : सांगलीत नाट्यगृहाच्या आवारात मधमाशाच्या हल्ल्यात 15 कलाकार जखमी झाले आहेत. मिरजमधल्या बालगंधर्व नाट्य मंदिराच्या आवारात मधमाशांच्या घोळक्याने वाराणसी, मुंबईहून आलेल्या कलाकारांवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.


पंडित कालिनाथ मिश्रा यांच्या 'नाद तांडव' या कार्यक्रमापूर्वी नाट्यगृहाच्या आवारातच असलेल्या एका झाडावरील पोळ्यातल्या मधमाशांनी कलाकारांवर हल्ला केला. यामुळे सर्व कलाकार सैरभैर पळत सुटले आणि माशा गेल्यानंतर नाट्यगृहात परतले.

विशेष म्हणजे जखमी असूनही त्या कलाकारांनी कार्यक्रम सादर केला. यामुळे बालगंधर्व नाट्य मंदिरातील व्यवस्थापनाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

बालगंधर्व नाट्य मंदिराकडून मात्र यावर अजब उत्तर देण्यात आलं आहे. एका कलाकाराने या माशाच्या पोळ्याला दगड मारल्याने हा सगळा प्रकार घडला असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. या एकूण प्रकारामुळे मात्र महापालिकेची नाट्यगृहाच्या डागडुजीबाबत असलेली उदासीनता दिसून येते.