पिंपरी : पुण्याजवळील सणसवाडीत झालेल्या दगडफेकीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एका महिलेच्या तक्रारीनंतर संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, अॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव आणि असंघटित गुन्हेगारी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या आरोपानुसार, “भीमाकोरेगाव इथे शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी गेले असताना, मैत्रीण चाकण शिक्रापूर मार्गे निघाली. शिक्रापूर टोल नाक्यावरुन मैत्रीण सणसवाडी इथे पोहोचली. तिथे लोकांची दगडफेक, जाळपोळ सुरु होती. तसंच झेंडे जाळण्यात आले. जमावातील काही लोकांकडे हत्यारं असल्याचं मैत्रिणीने स्वत: पाहिलं. त्याचा वापर करुन लोकांना मारहाण करत होते. ही घटना भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांनी घडवून आणल्याचं पाहिलं.”



याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला असून तो झिरो नंबरने तपासासाठी शिरुर पोलिस ठाण्याकडे पाठवण्यात येणार आहे.

  • उद्या महाराष्ट्र बंद
    सणसवाडी इथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "उद्या महाराष्ट्र बंदची हाक देतोय. लोकांनी शांततेत बंद पाळावा, कोणावरही जबरदस्ती कर नये. आम्ही कोणालाही आव्हान देत नाही आहोत, त्यामुळे प्रतिआव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो, असं करु नये. त्यामुळे हा बंद शांततेत पार पडावा, अशी आमची इतर संघटनांना विनंती आहे."



  • संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे सूत्रधार
    "शिवप्रतिष्ठान, हिंदू एकता आघाडी यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांमार्फत दगडफेक करायला लावली. तिथल्या गाड्याही जाळल्या. जे लोक परत जात होते, त्यांना मारहाण करुन गाड्याही जाळल्या," असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. "मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि मांजरीतील घुगे हे या घटनेचे सूत्रधार आहेत. त्यांनी हे सगळं कटकारस्थान रचलं आहे," असा दावा त्यांनी केला.



  • सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री
    पुण्यातील सणसवाडी इथे झालेल्या दगडफेकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या घटनेची विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. "इंग्रज आणि पेशव्यांमधील लढाईला 200 वर्ष झाल्याने भीमा-कोरेगाव इथे दरवर्षी हजारो लोक येतात. एरव्ही इथे 15 ते 20 हजार लोक येतात, मात्र यंदा अंदाजे साडेतीन लाख लोक आले होते," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



  • दंगलीचा प्रयत्न मात्र पोलिसांची सजगता
    मुख्यमंत्री म्हणाले की, "मात्र डाव्या आणि सामाजिक संघटनांनी इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांच्या सहा कंपन्यांना इथे पाचारण करण्यात आलं होतं. इथे दंगल घडावी, असाच प्रयत्न होता. परंतु पोलिसांच्या सजगतेमुळे दंगल घडली नाही. दगडफेक आणि गाड्यांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या, मात्र पोलिसांनी अतिरिक्त कुमक लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्रीपर्यंत सर्व उपस्थितांना बसमध्ये बसवून सुखरुप घरी पोहोचवण्यात आलं."



  • सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार
    शरद पवार म्हणाले की, "भीमा-कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. तिथे जाऊन आपली भावना व्यक्त करतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. त्या ठिकाणी या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा.लाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे.""जे घडलं त्याची चौकशी राज्य सरकारने करावी. जे सार्वजनिक क्षेत्रात काम करतात त्यांनी हे पसरु न देण्याची भूमिका घ्यावी. घडलेला प्रकार शोभादायक नाही. यावर पूर्णविराम कसा पडेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये, किंवा चर्चा करु नये. जे काही करायचे असेल ते सामंज्यस्याने करावं," असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.



  • सखोल चौकशी करा : रामदास आठवले
    गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हजारो-लाखो कार्यकर्ते येतात. पण कधीही अनुचित प्रकार घडला नाही. पण ही पहिलीच वेळ आहे, काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे आहे. तसंच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. लोकांना आवाहन आहे की, त्यांनी शांतात ठेवावी. शिवाजी महाराजांचे मावळे एकमेकांवर हल्ले करुन तुटून पडत आहेत, हे दृश्य कोणालाही न आवडणारं आहे.


संबंधित बातम्या

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवारगावांचं अनुदान बंद करा