Sanajya Raut on Maharashtra NCP Crisis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीवर जोरदार टीका करण्यात आली आहे. बुलढाण्यात (Buldhana Accident News) चिता जळत असताना शपथविधी पार पडला. त्यांना एक दिवस थांबता आलं असतं. इतकं निर्घृण राजकारण कधीच पाहिलं नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांच्या शपथविधीवर बोचरी टीका केली आहे.


महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आणखी एक दावा केला आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात लवकरच मुख्यमंत्री बदलणार आहेत. महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांना हटवून त्यांना आणि त्यांच्या 16 आमदारांना अपात्र ठरवलं जाईल."


'बुलढाण्यात चिता जळत असताना शपथविधी पार पडला : संजय राऊत 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "बुलढाण्यात चिता जळत असताना ज्या पद्धतीनं घाईघाईनं राजभवनावर शपथविधीचा सोहळा जल्लोषात, उत्साहात पार पडला. हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षणं आहे. बुलढाण्यातील अपघातात बारामतीतील तीन जणांचा मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील प्रवाशांचाही समावेश होता. मृतदेहांची ओळख पटत नाहीये, नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे आणि 24 तास या दुर्घटनेला होत नाही, तोच राजभवनामध्ये हे सर्वजण पेढे वाटत होते, फटाके फोडत होते. या महाराष्ट्रानं इतक्या निर्घृण पद्धतीचं राजकारण कधीच पाहिलेलं नाही. घाई होती शपथ घेण्याची पण 24 तास थांबता आलं असतं. पण दुर्दैवानं काल जे चित्र महाराष्ट्रानं पाहिलं ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारं आहे."


"महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून आणि इतिहासातून बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या टोलेजंग नेतृत्त्वाचं कार्य, त्यांचा संघर्ष आणि इतिहास कायमचा पुसून टाकला जावा, यासाठी हे अत्यंत घाणेरडं, निर्घृण राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरूये तो पूर्ण होणार नाही, शरद पवारांचं नेतृत्त्व संपवण्याचा प्रयत्न सुरूये ते आज कराडला आहेत. यंशवंतराव चव्हाणांचं नाव पुसण्याचं, त्यांची परंपरा पुसण्याचं काम सुरू आहे.", असं संजय राऊत म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut Full Pc : शिंदे आता काही दिवसच सीएम राहतील : संजय राऊत : ABP Majha



मी सत्य सांगतोय, अजित पवारांचं नियोजन उपमुख्यमंत्रीपदासाठी नाही : संजय राऊत 


काही करुन महाराष्ट्रात गद्दारीचा, बेईमानीचा नवा इतिहास लिहिला जावा. महाराष्ट्रात नवीन पात्र निर्माण व्हावी राजकारणात, यासाठी हा खेळ चालू आहे, तो लोकशाहीला, देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारा नाहीये, असं संजय राऊत म्हणाले. मी आधार सांगत नाही. मी सत्य सांगतो की, अजित पवार यांचं जे नियोजन, प्रयोजन, आयोजन आहे, ते फक्त उपमुख्यमंत्रीपदासाठी नाही. अजित पवारांनी घेतलेला निर्णय यांचा निर्णय त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. त्यावर मत व्यक्त करणं हे बरोबर नाही. पण या निर्णयाचे दुरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेले आहेत आणि यापुढेही होतील, असंही संजय राऊत म्हणाले. 


राऊत बोलताना म्हणाले की, "अजित पवारांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री पदी शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. पण यंदा मात्र त्यांचं डील जे आहे ते मुख्यमंत्रीपदासाठी आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र 100 टक्के ठरतायत. दिल्लीतली त्यांची जी महाशक्ती आहे, त्यांनाही हे कळून चुकलंय आपण त्यांना वाचवू शकत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावीच लागेल. ऑगस्ट 10 तारखेपर्यंत हा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. त्यामुळे पुढली व्यवस्था भाजपनं केली. अजित पवार यांना मुख्यमंत्री पद देऊन ती जागा भरुन काढण्याचं काम काल झालं आहे."


अजित पवार नागालँडला जाऊन उपमुख्यमंत्री झालेले नाहीत : संजय राऊत 


अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं म्हटलं. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "नागालँडची परिस्थिती वेगळी होती. अजित पवार नागालँडला जाऊन उपमुख्यमंत्री झालेले नाहीत. महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. नागालँड हे सीमावर्ती राज्य आहे आणि त्या सरकारमध्ये असे प्रयोग नेहमी होत असतात. नागालँड, मणिपूर, मिझोरम, मेघालयच्या राजकारणाची तुलना महाराष्ट्राच्या राजकारणाशी कोणी करत असले, तर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा, संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra NCP Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं; कोणाचे किती आमदार?