सांगली : खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठीचे चाललेले प्रयत्न थांबवावेत, असे म्हणत संभाजी भिडे गुरुजी हे उदयनराजेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. ते सांगलीत एबीपी माझाशी बोलत होते.


संभाजी भिडे गुरुजी काय म्हणाले?

“खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठीचे चाललेले प्रयत्न थांबवावेत. उदयनराजेंना अटक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला चिड निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यांची अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ.”, असा इशारा संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला.

“उदयनराजेंवर केलेले आरोप घाणेरडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. उदयनराजे असं वागतील यावर परमेश्वरही विश्वास ठेवणार नाही. त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र शासनाकडून खुप मोठं पाप होईल आणि त्यांनी ते करु नये.”, असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले होते.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला होता.