मुंबई : एसटी महामंडळात केवळ निधी अभावी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या ताफ्यातील 90 हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचारी सध्या हवालदिल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात लवकर व्हावेत यासाठी राज्यातील विविध संघटनांनी राज्य सरकारने एसटी महामंडळाला कमीतकमी 5 हजार कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी केली आहे.


याबाबत बोलताना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे श्रीरंग बरगे म्हणाले, एसटी महामंडळाला शासनाकडून नेहमीच मागणी पेक्षा खूपच कमी प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. याचा फटका आता कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच एसटी महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांवर देखील झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून डिझेलसाठी निधी नसल्यामुळे अनेक गाड्या बस स्थानकात उभ्या आहेत. ज्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यांवरील कर्मचाऱ्यांना तत्काळ रजेवर जाण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबांनी जगायचं कसं असा सवाल आहे. आमची उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांना विनंती आहे त्यांनी तत्काळ 5 हजार कोटी रुपये एसटीला संकटातून वाचवण्यासाठी उपलब्ध करुन द्यावेत. 


दुसरीकडे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हंटल आहे की, डिझेलसाठी एसटीकडे पैसे नाहीत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा घेण्याची मंडळाकडून सूचना येणं हे दुर्दैवी आहे. त्या कर्मचाऱ्यांनी कामवार असून देखील त्यांना पगार न देणं हे कायद्याचा भंग आहे. त्यामुळे आम्ही जर अशा प्रकारे महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला तर आम्ही तत्काळ राज्यात मोठं आंदोलन उभं करु. यासोबतच प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला कर्मचाऱ्यांचे पगार होतात मात्र आज 12 तारीख आली आहे तरी देखील कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत त्यामुळे याबाबत देखील सरकारने तत्काळ मार्ग काढावा. अन्यथा आम्हांला आंदोलनाचा हत्यार उगारावं लागेल