Maharashtra नागपूर :  वाराणसी शहरातील मंदिरांमधून सनातन रक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे साईबाबांच्या मूर्ती हटवल्याचा प्रकार (Sai Baba Idols Removed From Temples) घडलाय. आतापर्यंत सनातन रक्षक संस्थेने शहरातील 14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती (Saibaba Idols) हटवून त्यांचे गंगेत विसर्जन केल्याची माहिती आहे. यामध्ये बडा गणेश मंदिराचाही समावेश आहे. दरम्यान देशभरात साईबाबांना (Shirdi Saibaba) मानणारा मोठा भक्त समुदाय आहे. त्यामुळे वाराणसीमधील या घटनेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात असताना या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहे. राज्याच्या सर्वच स्थारातून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली जात असताना, आता महाराष्ट्रातील शिर्डी येथील मंदिरासाठी जागा देणारे गोपाळराव बुटी यांच्या कुटुंबीयांनीही खंत व्यक्त केली आहे.


मूर्ती हटवण्यासंदर्भात जी काही मोहीम अत्यंत दुर्दैवी  


उत्तर प्रदेशात विविध मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यासंदर्भात जी काही मोहीम चालवली जात आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. साईबाबा ना हिंदू होते, नाही ते मुस्लिम होते. ते एक धर्मनिरपेक्ष संत होते आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या संदर्भात असा वाद निर्माण करून भाविकांच्या भावनाशी खेळ करणं, हे  अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुभाष बुटी यांनी दिली आहे. सुभाष बुटी यांचे आजोबा गोपाळराव बुटी यांनीच महाराष्ट्रातील शिर्डी येथील मंदिरासाठी जागा दिली होती. शिर्डीतील बुटी यांच्या वाड्यामध्येच साईबाबांनी समाधी घेतली होती. 


मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवायच्याच असतील, तर ते हटवण्याची पद्धत योग्य असायला हवी. बाबांच्या मूर्ती हटवल्यानंतर भाविकांच्या भावनांचा आदर करत संबंधित मूर्तीची योग्य ठिकाणी प्रतिष्ठापना करून रीतसर पूजाही केली पाहिजे, अशी अपेक्षाही कल्याणी बुटी (सुभाष बुटी यांच्या पत्नी) यांनी व्यक्त केली आहे. 


सरकारने या प्रवृत्तींना अटकाव घालण्याची मागणी 


दुसरीकडे या घटनेचा परभणीच्या पाथरीतील साई जन्मस्थानच्या विश्वस्थानी निषेध केला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे अनेक मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती या पूर्वीपासून आहेत.  अचानक अशी काय घटना घडली की ज्या घटनेमुळे अशा प्रकारचे कृत्य काही विघातक प्रवृत्ती करत आहेत? त्यामुळे या घटनांचा निषेध करत परभणीच्या पाथरी येथील साई जन्मस्थानच्या विश्वस्तानी या प्रवृत्तींना अटकाव घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे.


उत्तरप्रदेशच्या वाराणसी आणि परिसरातील मंदिरामध्ये असलेल्या साईबाबांच्या मूर्ती पाडण्यामागे नेमकं काय कारण आहे? हे कोणाला समजायला तयार नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना करू नयेत. साईबाबा हे हिंदू होते  ते सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहेत. देशातील सर्वच भागात त्यांना माननारा एक मोठा वर्ग आहे. तिथल्या लोकांना नेमका आताच काय झाले आहे, ज्यावरून ते अशा प्रकारचे कृत्य करत आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा निषेध करत या प्रवृत्तींवर कारवाई करण्याची मागणी परभणीच्या पाथरी येथील साईबाबा जन्मस्थान येथील विश्वस्त आणि साई भक्तांनी केली आहे.


हे ही वाचा