औरंगाबाद : "वेळ आलीच तर कोणतं खत, कोणतं बियाणं वापरावं याची जाण आहे, कोणत्या पाखरांना हाणायचं कळतं. पीकावर येणाऱ्या पाखरांना हाणण्यासाठी  गोफण तयार आहे, ती भिरकावण्यासाठी सज्ज आहे", असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.


एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

तत्वाचा बुरखा पांघरुण फार दिवस राजकारण करता येत नाही असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर पुन्हा एकदा निशाणा साधला. तसंच राजू शेट्टींनी जर आपल्या मुलाचा प्रचार केला असता तर चित्र वेगळं असतं असं सांगत सागर खोत यांच्या निसटत्या पराभवाबद्दल सदाभाऊ खोत यांनी खंत व्यक्त केली.

"मी आयुष्यात गांधी वाचला आहे. हिटलर वाचण्याची कधी इच्छाच झाली नाही. व्यक्ती स्वातंत्र्य द्या, ही महात्मा गांधींची शिकवण आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. त्यामुळे सल्लागार कोण आहेत हे नेतृत्त्वाने पाहावं, मला वेगळं काही करायचं नाही", असं सदाभाऊंनी नमूद केलं.

"आम्ही दोघे जीवलग मित्र आहोत. मतभेद होते ते लपवण्याचं काही कारण नाही.


मात्र टोकाचे मतभेद नाहीत",


असंही सदाभाऊ म्हणाले.


राजू शेट्टींचा शेतकऱ्यांबाबत अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या अभ्यासाचा सरकारला, शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असल्याचं सदाभाऊंनी नमूद केलं.

झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताकदीने काम करेन. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांचं नेतृत्व शेतकरी करेल, कोणाच्या आरोपांची पर्वा करत नाही, असं सदाभाऊ म्हणाले.

"माझा मुलगा चळवळीतून पुढे आला,


नवं नेतृत्त्व समोर यावं म्हणून निवडणूक लढवली.


जनतेचा कौल मान्य.


मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो "


- सदाभाऊ खोत


VIDEO: