गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार, अशी चर्चा सुरु असून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत वेगळी संघटना काढणार असल्याचा कयास लावला जात आहे. राजू शेट्टी आणि खोत यांच्यात सध्या टोकाचा संघर्ष सुरु असताना आज शेट्टी मात्र सदाभाऊ यांच्याबाबत आशावादी होते.
राजू शेट्टी यांच्या माढ्यातील आजच्या कार्यक्रमाला सदाभाऊ खोत यांना मानणाऱ्या संघटनेतील जिल्हाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यानी पाठ फिरवल्याने फुटीचे संकेत स्पष्टपणे दिसत असल्याचे निदर्शनास आणताच रेल्वेगाडीमध्ये काही लोक चढत असतात, तर काही उतरत असतात. त्यामुळे कोण आले आणि कोणी गेल्याने संघटनेस काही फरक पडणार नसल्याचेही शेट्टी यानी सांगितले.
रघुनाथदादा पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, “असल्या किरकोळ लोकांच्या टीकेला उत्तर द्यायला मला वेळ नाही.”. शिवाय, सरकारचा पाठिंबा कधी काढणार, ते वेळ आल्यावर कळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.