Jalgaon News Update : "एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असे समजण्याचे कारण नाही. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना माहिती आहे. सर्वांना त्यांची कीव येते. पक्ष राहिला नाही, नाव राहिलं नाही, कार्यालय नाही, तरी देखील आपला भोंगा सुरु करायचा, संजय राऊत (Sanjay Raut) हे महाशय गेल्या दोन दिवसांपासून कशा पध्दतीने शिवराळ भाषा वापरत आहेत. संजय राऊत हे वाचाळवीर आहेत.  त्यामुळे ते तोंडात येईल तसे बडबड करतात. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे.  


गिरीश महाजन यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. "एकीकडे विधानसभेत अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी मांडायची, मोठमोठ्याने भाषणे करायची आणि दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघात पोलिसांनी छापा टाकला की माझी माणसे आहेत म्हणून पोलिसांना फोन करायचा, पोलिसांना धमकायचं. त्यामुळे खडसे साहेबांचं सर्व पितळ उघडं पडतयं. एकनाथ खडसे यांच्या अनेक चौकशा सुरु आहेत. नेमकी कोणती चौकशी सुरु आहे हे माहित नाही. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार ती चौकशी सुरु असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. 


"कापसाला एकीकडे 12 हजार रूपये भाव होता. मात्र सध्या जे भाव कापसाला आहेत ते खते आणि रासायनिक औषधांच्या तुलनेत खूप कमी आहे, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. "आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या गठाणींना भाव कमी झाल्यामुळे हा भाव थोडा तुटलेला आहे. पण सरकार निश्चित याबाबत सकात्मक विचार करत आहे. याच अधिवेशनामध्ये याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सर्व किंमतीची भाव वाढ अवलंबून असते. त्यामुळेच गॅस सिलेंडर असेल किंवा इतर वस्तूंचे दर वाढल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 


गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. "अडीच-तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही. आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे. आता उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे असे म्हणण्याची वेळ आलीय. त्यामुळे यांनी आता कितीही सभा घेतल्या तरी त्याचा उपयोग नाही. लोकांनी एकदा संधी दिली होती. या संधीची यांनी माती केली, असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला.  


राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डॉन असल्याची टीका केली होती. त्यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "तुम्ही स्वत:ला डॉन समजत होते. लोकांना वळ येईपर्यत, जीव जाईपर्यंत मारहाण केली. त्यामुळे डॉन कोण आहे? चोर कोण आहे? हे लोकांना कळालेले आहे. त्यामुळे तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असे मंत्री महाजन यांनी म्हटलं आहे.