Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याची पहिली उचल नाकारत आंदोलन तीव्र करत ऊस वाहतूक रोखली होती. त्यानंतर संघटना कारखाना प्रशासनात झालेल्या चर्चेनंतर पहिल्या उचलमध्ये 25 रुपयांची वाढ निर्णय घेतला. त्यामुळे स्वाभिमानीने आंदोलन मागे घेतले आहे. 


दालमिया शुगरकडून पहिली उचल 3075 रुपये जाहीर केल्यानंतर स्वाभिमानीकडून कारखान्याची ऊस वाहतूक रोखण्यात आली होती. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना गेटसमोर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.


संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखान्याची (dalmia karkhana) ऊस वाहतूक रोखली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिली उचल कमी असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासन आणि संघटना पदाधिकाऱ्यांची झालेली पहिली चर्चाही फिस्कटली होती. जोपर्यंत 3 हजार 75 पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखान्याच धुरांड पेटवू देणार नाही, असा इशाराच स्वाभिमानीने दिला होता. मात्र, आता दुसऱ्या फेरीत चर्चेतून तोडगा निघाल्याने  कारखान्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


पंचगंगा साखर कारखान्याची एफआरपी नाकारली 


पंचगंगा साखर कारखान्याकडून (panchganga karkhana) एफआरपी 3 हजार 50 एफआरपी जाहीर करण्यात आल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारखान्याची तोडणी, वाहतूक वजा करून 3 हजार 106 रुपये एफआरपी होत असताना 56 रुपये कमी एफआरपी जाहीर केल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे. त्यामुळे ही एफआरपी मान्य नसल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे. 3106 रुपये एफआपी जाहीर होत नाही तोपर्यंत गळीत हंगाम सुरु करणार नसल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंचगंगा साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली होती. 


तापर्यंत शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी तसेच शिरगुप्पे शुगर कारखान्याची ऊस वाहतूक आतापर्यंत स्वाभिमानीने रोखली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीसाठी कारखानदार आणि स्वाभिमानीमध्ये संघर्ष अटळ दिसू लागला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या