सांगली  :  बेसुमार माती उपसा केल्यामुळे नदीकाठ खचला असल्याच्या तक्रारीवरुन गंभीर दखल घेत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.  या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी चौधरी यांनी दोन मंडल अधिकारी आणि एका तलाठ्याला निलंबित केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.


मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावामधील नदीकाठी बेसुमार माती उपसाप्रकरणी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी कडक कारवाई केल्याने प्रशासन हादरून गेले आहे.  बेसुमार माती उपसा केल्यामुळे नदीकाठ खचला असल्याच्या तक्रारी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे आल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी करत ही कारवाई केली. निलंबन केलेल्यांमध्ये मिरजेच्या तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी राजू कदम, बेडग येथील मंडल अधिकारी राजू जाधव आणि म्हैसाळच्या तलाठी वैशाली वाले यांचा समावेश आहे.

मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावामधील सहा शेतकर्‍यांना माती उपसा करण्यास परवानगी दिली गेली होती. या माती उपशावर लक्ष ठेवण्यास प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्‍त केली होती. या समितीने ज्यावेळी माती उपसा करण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी
परवानगी असल्यापेक्षा जास्त माती उपसा केल्याचे समितीच्या लक्षात आले.

यात सुमारे 16 हजार 434 ब्रास माती उपसा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. बेसुमार माती उपसा प्रकरणी तहसीलदार पाटील यांनी संबधित शेतकर्‍यांना 5 कोटी 15 लाख रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या होत्या. यातील माती उपसा करण्यास परवानगी मिळालेल्या सहा शेतकर्‍यांनी बेसुमार माती उपसा करून ती वीटभट्टीचालकांना विकली. त्यामुळे या सहा शेतकऱ्यांसह 23 जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशेष म्हणजे परवान्यापेक्षा जादा माती उपसा केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी  बेडगचे मंडल अधिकारी राजू जाधव यांचाच पुढाकार होता. त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत 23 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र चौकशी समितीत जाधवच दोषी ठरल्याने त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली.