औरंगाबाद : देशात आॅटोमोबाइल इंडस्ट्रीवर मंदीचं सावट आहे. या मंदीमुळे 10 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास राज्याचं ऑटोमोबाइल हब अशी ओळख असलेल्या औरंगाबादमधील लाखाहून अधिक लोकांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. सध्या औरंगाबादमधील औद्योगिक वसाहतीतील हजारो सूक्ष्म, लघू  आणि मध्यम उद्योग दुष्काळ, जीएसटी आणि मंदीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. औरंगाबाद शहराची महाराष्ट्राची पर्यटन राजधानी ही जशी ओळख आहे तशीच  आॅटोमोबाइल हब म्हणून देखील आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांच्या दुचाकी, चार चाकी गाड्यांसाठीच्या सुट्या भागांचे येथे उत्पादन होते. आॅटोमोबाइल पार्टसच्या उत्पादनाबाबत औरंगाबादचा राज्यात पहिला क्रमांक आहे.  औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत तयार होणारे दुचाकी, चार चाकींसाठीचे सुटे भाग दिल्ली, गुजरात, दक्षिण भारतातील उद्योगांना पुरविले जातात. मात्र काही महिन्यांपासून वाहनांच्या विक्रीतील घट, जीएसटीचा बोजा, दुष्काळजन्य परिस्थिती, वाहन उद्योगांवर मंदीचे ढग यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीत वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कंपन्यांनी उत्पादन घटवल्यामुळे कामगारांच्या शिफ्ट कमी झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात ही परिस्थिती कायम राहिल्यास मंदीच्या संकटामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आॅटोमोबाइल इंडस्ट्रीवर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी छोट्यामोठ्या उद्योगांना शाश्वत मदतीची गरज आहे.