राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा ईव्हीएमला विरोध नव्हता. 'ईव्हीएमचा मुद्दा उचलला तर कार्यकर्ते मनाने खचतात, कितीही काम केलं तरी ईव्हीएम मॅनेज होत असेल तर काम कशाला करायचं ही निराशा कार्यकर्त्यांच्या मनात येते', असं अजित पवार यांना वाटत असल्याने ते हा मुद्दा उचलण्यास इच्छूक नव्हते.
राजू शेट्टी, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि आजच्या पत्रकार परिषदेचा अजेंडा ठरला.
ईव्हीएम मशीन विरोधात 21 ऑगस्टला गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदान किंवा आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत तालुका पातळीवर, गावागावात ईव्हीएमबाबत प्रचार करण्याचे ठरले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार विरोधातील मतांचे विभाजन होऊ नये, विरोधकांनी एकत्र यावे यासाठी राजू शेट्टी यांनी पुढाकार घेऊन सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
यात नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येईल का?
ईव्हीएम मशीनविरोधात नारायण राणे यांनी देखील भूमिका मांडली होती. परंतू ते या मोर्चामध्ये सहभागी होतील की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही.
परंतू ईव्हीएम मशीन हे निमित्त असलं तरी ह्यातून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला सुरुवात केली आहे. ही विरोधकांची आघाडी भाजप आणि शिवसेनेचे आव्हान पेलू शकेल का? निवडणुकीत ही आघाडी टिकेल का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.