मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारमधून बाहेर पडण्याच्या हलचालींना वेग आला असून, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा खा. राजू शेट्टी यांच्याकडे दिला आहे. यानंतर पणनमंत्री सदाभाऊ खोत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीवरुन राजू शेट्टींनी सरकारविरोधात एल्गारच पुकारला आहे. शिवाय, नुकत्याच पुण्यात झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही शेट्टींनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता.

दुसरीकडे पंचायत समिती निवडणुकीत सदाभाऊ खोत यांच्या मुलाला राजू शेट्टींनी विरोध केल्याने, तेव्हापासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यातील कुरबुरी दिवसेंदिवस वाढतच आहेत. संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही सदभाऊंबद्दल इतर पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे या तक्रारींबाबत सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शिवाय या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिल्याने, रविकांत तुपकर यांनी आपल्या वस्त्रोद्योग महामंडळ पदाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा खा. राजू शेट्टी यांच्याकडे दिला आहे. पण तुपकरांच्या राजिनाम्यानंतर सदाभाऊ खोत हे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, रविकांत तुपकर यांची 13 मे 2015 रोजी यंत्रमाग मंडळाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारने नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीला काँग्रेस नेते चंद्रकांत दायमा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

सरकार बदलल्यानं केवळ राजकीय हेतूनंच यंत्रमाग मंडळाच्या अध्यक्षपदावरून आपली उचलबांगडी करण्यात आल्याचं दायमा यांनी यावेळी न्यायालयाला सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं मान्य करुन मुंबई उच्च न्यायालयाने तुपकरांची नियुक्ती रद्द केली होती.

पण दोनच दिवसांनी फडणवीस सरकारने तुपकरांची वस्त्रोद्योग महामंडळाच्या पदावर नियुक्ती केली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिल्याने, तुपकरांनी आपल्या पदाचा राजीनामा खा. राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.