अमरावती : अकोला जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवि राणा आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात चांगलीच जुंपली होती. अमरावतीच्या अचलपूर शहरातील केंद्र सरकारचा उपक्रम असलेली फिनले मिल कोरोना लॉकडाऊनपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. या बैठकीत मिलसाठी देण्यात येणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या निधीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. आता, आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडूंवर खोचक टीका केली असून आयत्या पिठावर नागोबा म्हणत त्यांना डिवचलं. तर, बच्चू कडू यांनीही फिनले मिल बंद असल्यावरुन येथील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. 


कापूस उत्पादन क्षेत्र असलेल्या अमरावती शहराला टेक्स्टाईल झोन घोषित करण्यात आलं आहे. त्यासाठी कापूस ते कापड या प्रक्रिया उद्योगात विदर्भात महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी अचलपूर येथील फिनले मिल देखील सुरू केली. मात्र, अमरावतीचा केंद्रातील मोठा उद्योग असलेली हीच फिनले मिल कोरोना लॉकडाऊनपासून बंद पडला आहे. या फिनले मिलमध्ये किमान 800 ते 900 स्थानिक कामगार काम करत होते. मात्र, मिल बंद असल्याने कामागारांची उपासमार सुरू आहे. या मिलसाठी अनेकांनी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत. लोकप्रतिनीधींनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्‍यांपर्यंत हा प्रश्न नेला होता. मात्र, मिल अद्यापही सुरू झालेली नाही. तरीही, दोन्ही आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई होत आहे. आमदार रवि राणा यांनी या मिलसाठी खासदार नवनीत राणा यांनी व मी सातत्याने प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. तसेच, आमदार बच्चू कडू यांच्यावर खोचक शब्दात टीकाही केली.   


नुकतेच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान, फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार रवि राणा यांनी दिली. तसेच, ही मिल सुरू करण्यासाठी मी व माजी खासदार नवनीत राणा यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, आमदार बच्चू कडू हे आयत्या पिठावर नागोबा बनले आहेत. बच्चू कडूं विविध जिल्ह्यात जाऊन नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो , नौटंकी करतो, असे म्हणत आमदार राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार प्रहार केला.  


दरम्यान, बंद असलेल्या फिनले मिलसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपये मंजूर केले. त्यावरून आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांना टोला लगावला. त्यावरुन, दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.