रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या अटकेबाबत सांगताना सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. "वाह रे शासन तेरा खेल, न्याय मांगे तो हो गयी जेल," असे शालजोडे त्यांनी दिले. "तसंच अडीच वर्ष ठेवलं मला आतमध्ये. मला का पकडलं ते मलाही माहित नाही, ज्यांनी पकडलं त्यांनाही माहीत नाही," असं म्हणत भुजबळ यांनी सरकारची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीच्या 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रेनिमित्त गुहागर इथे भुजबळ बोलत होते.


दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. भुजबळ दोनपेक्षा जास्त वर्ष तुरुंगात होते. 14 मार्च 2016 रोजी त्यांना अटक केली होती. तर 4 मे 2018 रोजी भुजबळांना अखेर जामीन देण्यात आला.

याविषयी छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदनामध्ये 25 हजार कोटी खाल्ले असं बोलतात. 25 हजार कोटी?
मग म्हणाले 10 हजार कोटी खाल्ले, आता फक्त 850 कोटी, अरे 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट होतं. विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठरवलं की या माणसाकडून हे काम करुन घ्या 100 कोटींचं. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझं काम होतं की, ते चांगलं बनवून घ्यायंच आणि दिल्लीत नाव गाजवायचं.

"पण मलाच कळलं नाही, ज्या 850 कोटींचा माझ्यावर ठपका लावला, तसंच ज्याने ते बनवलं तो बिचारा कोकणात जाऊन बसलाय, त्याला एक रुपया दिला नाही. ज्याने एवढी सुंदर इमारत बांधली, त्याला एक रुपया सुद्धा दिला नाही, तो माणूस मला 850 कोटी रुपये कसा देईल? पाच फुटांची गाय गाभण राहिली आणि बाळंत झाली तर तिला 15 फुटांचं रेडकू होईल का? 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देता आणि 850 कोटी खर्च होतात?", असं छगन भुजबळ म्हणाले.

दिवसा भूलभुलय्या चालू आहे, आमच्या नरेंद्र मोदी साहेबांचा, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. तसंच मोदींवर टीका करताना एक कविताही त्यांनी म्हटली. ती अशी की....

तुझे फकीर कहूं या गंगा
लखपतियां कहूं या नंगा
तुझे भाषणवीर कहूं या दंगा
तेरे रुप अनेक हैं भाया
तू बहुरुपियां हैं रंगबिरंगा
ढलते डिसेंबर के साथ
हमारी सारी गलतियां माफ कर देना
और 2019 में बीजेपी को साफ कर देना