रत्नागिरी : अजगराला जिवंत जाळणाऱ्या दोघा जणांना रत्नागिरीत अटक करण्यात आली आहे. त्याहून वाईट म्हणजे हा निर्लज्जपणा करतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. या प्रकरणी वन विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील सुरेश हांडे आणि अनंत हांडे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.


राजापूर तालुक्यातील तळवडे गावच्या कुंभारवाडीतील एका घरात अजगर शिरला होता. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली. ज्या हांडे कुटुंबियांच्या घरात हा अजगर शिरत होता, त्यांनी आपले शेजारी अनंत हांडे यांच्या मदतीने अजगराला हटकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण अजगर बाहेर पडत नसल्याने त्यांनी अजगराला काठीने मारलं.

अजगर मेला, असं गृहित धरुन दोन्ही आरोपींनी अजगराला पकडलं आणि त्याच्यावर गवत टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मृत वाटलेला अजगर जिवंत असल्याने आपला जीव वाचवण्यासाठी वारंवार बाहेर येत होता. हे लक्षात येताच त्यांनी काठीच्या सहाय्याने त्याला पुन्हा जाळात ढकललं.

अजगराला जिवंत जाळतानाचं चित्रीकरण काही जणांनी आपल्या मोबाईलवर केलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ पाहून अजगर जाळणाऱ्यांचा शोध सुरु झाला. अखेर राजापूर वन विभागाने शोध लावत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी मुंबईचा असून, घटना घडली त्या दिवशीच तो गावात आला होता.