Ratnagiri District Central Co-operative Bank Election : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी (RDCC) बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत. मंगळवारी अर्थात काल रात्री उशिरापर्यंत उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर 21 पैकी 12 जागांवर निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, 9 उमेदवार हे बिनविरोध आले आहेत. मुख्यबाब म्हणजे आरडीसीसी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीयांना पुढाकार घेतला होता. त्यासाही सहकार पॅनल उभे करण्याचा निर्णय झाला होता. मुख्यबाब म्हणजे याला राज्यात विरोधात असलेल्या भाजपनं देखील पाठिंबा दिला होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणं जवळपास निश्चित झाल्याचं चित्र होतं. काही ठिकाणी त्याला विरोध होता. पण, भाजप नेते निलेश राणे यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर याबाबतची चर्चा जोरात सुरु झाली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची आशा देखील कमी झाली. त्यानंतर सर्वच पक्षांमधील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे अखेर निवडणूक बिनविरोध होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले. अखेर 26 ऑक्टोबरला रात्री उशिरापर्यंत अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर 21 पैकी 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून 12 जागांवर निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. 


2 दिवस चालली अर्ज छाननी प्रक्रिया!


आरडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी 39 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले होते. यापैकी काहींनी दोन तर काहींनी चार अर्ज देखील दाखल केले होते. जवळपास दोन दिवस अर्जांची छाननी आणि त्यावरील आक्षेप ऐकले गेले. त्यानंतर 12 जागांवर निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. 


कुणाची बिनविरोध निवड?


21 पैकी सहा जागांवर सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या उमेदवारांचा एकमेव अर्ज दाखल होता. छाननीमध्ये सहाही अर्ज वैध ठरले. त्यामुळे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक राजेंद्र सुर्वे, सुधीर कालेकर, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जयवंत जालगावकर अधिकृतरित्या बिनविरोध निवडून आले. तर, दोन दिवसांच्या छाननीमध्ये मंडणगड तालुका मतदारसंघातून रघुनाथ पांडुरंग पोटसुरे यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे सहकार पॅनलचे रमेश राजाराम दळवी बिनविरोध झाले. राजापूरमधून रवीकांत केशव रूमडेंचा अर्ज अवैध ठरला परिणामी सहकार पॅनलचे महादेव दत्तात्रय सप्रे, आणि इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून रवीकांत रूमडे यांचा अर्ज बाद ठरल्याने रामचंद्र गणपत गराटे बिनविरोध झाले.


कुणाचे अर्ज वैध आणि कुणाचे अवैध?


दोन दिवस चाललेल्या अर्जांच्या छाननीवेळी जोरदार आक्षेप घेतले गेले. यावेळी विरोधकांच्या बाजुनं अॅडव्होकेट भाऊ शेट्ये तर सहकार पॅनलच्या वतीनं भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट  दीपक पटवर्धन यांनी बाजु मांडली. यानंतर महिला राखीवमधून नेहाली लिलाधर नागवेकरांचा अर्ज अवैध झाला. तर, नेहा रवींद्र माने, दिशा दशरथ दाभोळकर, स्नेहल सचिन बाईत, अश्‍विनी जालिंदर महाडिक यांचा अर्ज वैध ठरला आहे. विमुक्ती जाती, भटक्या जमाती मतदारसंघामधून सुरेश मारूती कांबळे, सचिन चंद्रकांत बाईत यांचा अर्ज वैध ठरला आहे. औद्योगिकमधून मधुकर शंकर टिळेकर, हरेश्‍वर हरिश्‍चंद्र कालेकर, इब्राहीम अहमद दलवाईंचा अर्ज वैध झाला आहे. मजूरमधून दिनकर गणपत मोहिते, राकेश श्रीपत जाधव, राजेंद्र मधुसुदन घागा यांचा अर्ज वैध ठरला आहे. नागरी पतसंस्थामधून नित्यानंद भार्गव दळवी यांचा अर्ज अवैध झाला. तर, संजय राजाराम रेडीज, अ‍ॅडव्होकेट. सुजित झिमण यांचे अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हास्तरीय कृषी पणनमधून आमदार शेखर निकम, सुनितकुमार आमगौंडा पाटील, महेश रवींद्र खामकरांचा अर्ज वैध ठरला आहे. कुक्कुटपालनमधून अमजद लतिफ बोरकर, विवेक शिवाजीराव सावंत तसेच दूधसंस्था मतदारसंघातून गणेश यशवंत लाखण, अजित रमेश यशवंतराव यांचा अर्ज वैध ठरला आहे. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सचिन नथुराम गिजबिलेंचा अर्ज अवैध ठरला आहे. तर, गजानन कमलाकर पाटील, प्रल्हाद महादेव शेट्ये यांचे अर्ज वैध ठरले आहेत. लांजामधून सुरेश विष्णू साळुंखेंचा अर्ज अवैध ठरला असून आदेश दत्तात्रय आंबोळकर, महेश रवींद्र खामकर यांचे अर्ज वैध ठरले आहेत. शिवाय, गुहागरमधून अनिल विठ्ठल जोशी, चंद्रकांत धोंडू बाईत यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता 12 जागांवर निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


मतदान, मतमोजणी केव्हा?


रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याकरता 26 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या तारखेचा कालावधी आहे. यादरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवाराला आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. तर, 11 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निशाणींचे वाटप केली जाईल आणि त्यानंतर अंतिम यादी प्रकाशित करण्यात येईल. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि  21 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात आरडीसीसी बँकेवर कुणाची सत्ता किंवा RDCC बँक कुणाच्या ताब्यात हे 21 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. सध्या ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.