मुंबई : राज्यात शुक्रवार 5 जानेवारी रोजी 146 जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सध्या राज्यात 931 सक्रिय रुग्णसंख्या असून JN.1 व्हेरियंटचे 110 रुग्ण राज्यात आढळून आलेत. त्याच पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत करुन येणाऱ्यांसाठी कोविड टास्क फोर्सकडून महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्यात. पुढील 15 दिवस काळजी घेण्याचे आवाहन टास्क फोर्सने केले आहे. 


देशभरात कोविड-19 च्या जेएन-1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ही 619 वर पोहोचली आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, 4 जानेवारीपर्यंत कर्नाटकात 199, केरळमध्ये 148, महाराष्ट्रात 110, गोव्यात 47, गुजरातमध्ये 36, आंध्र प्रदेशात 30, तामिळनाडूमध्ये 26, दिल्लीत 15, राजस्थानमध्ये 4 प्रकरणे आहेत. , तेलंगणा, हरियाणामध्ये 2 आणि ओडिशातून प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलेत. 


देशात JN.1 च्या रुग्णसंख्येत वाढ


कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे  केंद्र सरकारने आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.देशात JN-1 प्रकारांच्या संख्येत झालेली वाढ पाहता केंद्राने राज्यांना केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-19 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. JN-1 प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्व रुग्णालयांना इन्फ्लूएंझा सारखा आजार आणि श्वसनाच्या आजारावर लक्ष ठेवण्यास आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.


कोविड टास्क फोर्सच्या महत्त्वाच्या सूचना


ताप, सर्दी आणि खोकला आढळल्यास कोविड चाचणी करुन घेण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून देण्यात आलाय. कोविड टास्क फोर्सची 2 जानेवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना झाल्यास  गृह विलगीकरणात पाच दिवस राहावे लागेल. हवा खेळती राहिल अशा खोलीत रहावे. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरावे. घरातील ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अतिजोखिम असलेल्यांनी मास्क वापरावे. अतिजोखिम व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात यावे. अशा सूचना टास्क फोर्सकडून देण्यात आल्यात. 


दरम्यान नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच औषधोपचारासंदर्भात टास्क फोर्स क्लिनिकल प्रोटोकॉल जाहीर करणार आहेत. पण सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कोविड टास्क फोर्सकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी असं देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान परिस्थिती चिंताजनक नसली तरी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन करण्यात आले. 


हेही वाचा : 


पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा! छगन भुजबळ, गोपिचंद पडळकरांना कोणी अडवण्याचा प्रयत्न केल्यास तुडवून काढणार; ओबीसी नेत्यांचा इशारा