जालना: 'एकनाथ खडसेंच्या आरोपांबाबत फडणवीसांनी जो अहवाल दिल्ली दरबारी दिला तो खडसे यांच्या बाजूनंही असू शकतो.' असं म्हणत भाजपच्या रावसाहेब दानवेंनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते जालन्याच्या भोकरदनमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. खडसेंचं मंत्रिपद जाणार असल्याचा चर्चा चौफेर सुरु आहेत. त्यामुळे दानवेंचं हे विधान महत्वपूर्ण आहे.


 

दरम्यान काल दिल्ली दरबारी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींमध्ये जवळपास अर्धा तास गुप्त बैठक झाली. यापूर्वी फडणवीसांनी खडसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसदर्भातला अमित शाहांकडे सोपवला.

 

देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयात बंद दाराआड अमित शाह यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अंबरनाथमधील जमिनीसाठी लाच मागितल्याचं प्रकरण, लिमोझिनचं मॉडिफिकेशन आणि भोसरी एमआयडीसीतील जमिनीच्या खरेदीचा वाद याबाबतची सखोल माहिती मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना दिली.

 

एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं त्यांचा राजीनामा घेऊऩ त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरातून होते आहे. शिवसेना, आम आदमी पक्ष आणि अंजली दमानिया यांच्यासह काँग्रेसनं भाजपवर दबाव वाढवला आहे. त्यामुळं आता भ्रष्टाचार सहन करणार नाही, असं सांगणाऱ्या मोदी-शाह यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.