शिवसेनेचा टोन आजकाल बिघडला आहे, दानवेंच्या कानपिचक्या
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 11:17 AM (IST)
नाशिक : शिवसेनेचा टोन आजकाल बिघडलेलाच आहे, कोणताही निर्णय घेतला, तरी ते विरोधच करतात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला हाणला. नोटाबंदीच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागतच होत आहे. ग्रामीण भागाचं या निर्णयामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही, उलट जनतेने हा निर्णय स्वीकारलेलाच आहे. असं असतानाही शिवसेना विरोध करत आहे, अशा कानपिचक्या दानवेंनी दिल्या. रॉकेल, पेट्रोल, खतासाठी 60 वर्ष ज्यांनी लोकांना रांगेत उभं केलं, ते आता नोटांसाठी रांगेत उभं रहावं लागत असल्याची ओरड करत आहेत, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी काँग्रेसवरही टीका केली. विधानपरिषदेत भाजपाला फायदाच झाला आहे. आगामी पालिका निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचेच असतील, असा दावाही दानवेंनी केला. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.